🙏 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या निवडक अभंगांवर आधारित या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत! तुकोबारायांच्या अभंगांमध्ये भक्ती, परमार्थ, समाजप्रबोधन आणि आत्मानुभूती यांचे अद्वितीय संमेलन आहे. त्यांच्या ओव्या केवळ धार्मिक उपदेश नसून त्या आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतात. या ब्लॉगमध्ये आम्ही तुकाराम महाराजांचे निवडक अभंग, त्यांचे भावार्थ आणि कालसुसंगत अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनी केवळ अभंग वाचू नयेत, तर अनुभवावा – हा आमचा नम्र प्रयत्न आहे.. . . 🙏 धन्यवाद - गजानन रा. माने .

बुधवार, १८ जून, २०२५

कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां

       कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां ।

आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥

पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं ।
अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥

चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार ।
गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥

मळालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती ।
शूर उठावती । एका एक आगळे ॥३॥

नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ ।
आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥

आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख ।
धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥

मरण मुक वाराणसी । पितृऋण गया नासी ।
उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥६॥

तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता ।
सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥


कार्तिकीची वारी म्हणजे वैकुंठ अनुभवायला येतो. चला, डोळ्यांनी तो सोहळा पाहूया. 


प्रेमाचं पीक पूर्णपणे बहरलेलं आहे. पंढरपूर नगरी भक्तीने भरली आहे.


भजनी दिंड्या चालतात, गरुडपंखी पताका उंचावतात. टाळ, मृदंग, अभंगांनी वातावरण गंभीर होते.


साधू, संत, भक्त हर्षभरित होऊन डुलत आहेत. प्रत्येकाचे अस्तित्वच हरिभक्तीत हरवले आहे.




नामस्मरणाचा कल्लोळ असा आहे की, सारा कळिकाळही हादरून जातो.


ब्रह्मदेवही म्हणतो – मृत्यूलोकात इतकं सुख! धन्य ती पंढरपूर नगरी!


वाराणसी, गया यांचं महत्व कमी; कारण पंढरीत प्रत्यक्ष भगवंताचं सान्निध्य आहे.


तुकोबा म्हणतात – ज्याचं सर्वांवर प्रेम आहे, जो सर्व सिद्धी देतो – अशा विठोबाच्या पायाशी चिंता उरतच नाही

.

 कार्तिकी एकादशी म्हणजे प्रेम, भक्ती, नाद आणि संतांचा महाउत्सव. संत तुकाराम महाराज या वारीचा अनुभव आपल्या शब्दांमधूनच जणू प्रत्यक्ष दाखवतात. पंढरीला गेला तो वैकुंठाला गेला, असं म्हणतात – आणि तुकोबांचा हा अभंग हेच सांगतो की, मृत्युलोकातही वैकुंठाचं सुख अनुभवता येतं – जर मनात नितांत भक्ती असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नका दंतकथा येथे सांगो कोणी…” : तुकाराम महाराजांचा चिकित्सक विचार

नका दंतकथा येथे सांगो कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ।।१।। अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढे ।।२।। निवडी वेगळें क्षीर...

🧳 संतश्रेष्ठ, जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांचे निवडक अभंग ब्लॉगवर आपले मानवपूर्वक स्वागत . आपल्या सूचनांचे स्वागत आहे . 🌍